फलटण चौफेर दि. ९ फेब्रुवारी २०२६
खंडाळा तालुक्यातील मौजे सुखेड (जि. सातारा) गावच्या हद्दीतील चोपडे वस्ती परिसरात विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत, हातपाय बांधलेल्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत उलगडा करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ,दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आबा जयवंत चोपडे यांच्या विहिरीत अंदाजे २५ ते ३० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असून हातपाय बांधलेले असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा उघड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील साक्षीदारांची चौकशी, घटनास्थळाकडे ये-जा करणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत एक संशयित वाहन निष्पन्न केले. सलग तीन दिवस अहोरात्र तपास केल्यानंतर या घटनेचा धागा कळंबोली, साखरवाडी (ता. फलटण) आणि पुणे येथे राहणाऱ्या संशयितांपर्यंत पोहोचला.बंडू बापू भिसे (वय ४९) – रा. कळंबोली (मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण)विजय पोपटराव पवार (वय ३६) – रा.(माडकरमळा) साखरवाडी, ता. फलटण,किरण विकास गायकवाड (वय २७) – सध्या रा. पुणे (मूळ रा. होळ, ता. फलटण),श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५) – सध्या रा. धायरी, पुणे (मूळ रा.चुरमापुरी, जि. जालना) यांना अटक केली आहे पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांने त्याच्या मैत्रिणीबरोबर मयत सोमनाथ कल्याण बोबडे, रा. सेक्टर २०, कळंबोली ता. पनवेल जि. रायगड
याचे अनैतिक संबंधाच्या संशयातून इतर साथीदारांच्या मदतीने कळंबोलीहून त्याच्या चार चाकी गाडी क्रमांक mh 12 DY 8846मधून अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कळंबोली, साखरवाडी आणि पुणे येथून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून कोणतेही स्पष्ट पुरावे नसतानाही अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून अवघ्या ७२ तासांत प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS