साखरवाडी(गणेश पवार) (गुरुवार) सायंकाळी ४ पासून फलटण शहरात अचानक वादळ, वारे सुरु झाले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्या दरम्यान गिरवी भागात जोराचा पाऊस सुरु झाला आणि काही वेळात तरडफ येथे प्रचंड वादळ, वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु असताना अक्षरशः ढगफुटी सारखा प्रचंड पाऊस झाला. गाराही पडल्या, ओढ्याला पुर आला.
गिरवी येथे प्रारंभी हलका पाऊस झाला, नंतर पावसाने गिरवी व परिसराला अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान उपळवे (सावंतवाडी) येथे वीजेच्या धक्क्याने बजरंग साहेबराव फडतरे यांच्या ६ शेळ्या दगावल्या आहेत.
तरडफ येथे अशोक सदाशिव गोडसे यांची एक गाय दगावली आहे. तलाठी मंडलाधिकारी यांनी दोन्ही ठिकाणचे पंचनामे केले असून महसूल खात्याच्या माध्यमातून नियमाप्रमाणे मदत मिळेल. तथापि गाय व शेळ्या दगवल्याने दोन्ही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
तरडफ येथे सायंकाळी ५ नंतर वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शेतातील छप्पर वजा निवारे, पत्रा शेड पडले आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.
तरडफ येथे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात गारांचा वर्षाव सुरु झाला आणि अक्षरशः ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावात/रानात सर्वत्र पाणीच पाणी झाले, काही वेळात गावच्या ओढ्याला प्रचंड पूर आला. शेत जमिनींची प्रचंड धूप झाली आहे. बांध बंदिस्ती अनेक ठिकाणी वाहुन गेली आहे.
तरडफ येथे जीवन पांडुरंग रीटे यांच्या वीट भट्टीचे पावसाने सुमारे ४ ते साडेचार लाख रुपयांचे आणि अशोक गोडसे यांच्या गाईचे ७०/८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी/मंडलाधिकारी यांनी पंचनामे केल्यानंतर नुकसानीचा निश्चित आकडा समजेल.