साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे आयोजित भव्य जाहीर सभेत भाषण करताना उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेचा उल्लेख करत ती घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले. या घटनेवरून काही जणांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत त्यांनी त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “या घटनेमुळे मी फलटणला येऊ नये म्हणून काही प्रयत्न झाले होते. मात्र जर या घटनेत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा जरासा जरी संबंध असता, तर हा कार्यक्रम रद्द करून मी येथे आलोच नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला देवाभाऊ म्हणजे काय हे माहित आहे. या पीडित भगिनीला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास जलदगतीने सुरू आहे. काही दिवसांत या प्रकरणाचे सत्य समोर येईल. या घटनेवरून राजकीय लाभ घेण्याचा जो प्रयत्न केला गेला तो अतिशय निंदनीय आहे. समाजातील संवेदनशीलतेचा विचार न करता राजकारण करणे हे लाजिरवाणे आहे.
फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या पुढाकाराने विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, दौंडचे आमदार राहुल दादा कुल, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर,जयकुमार शिंदे,विक्रमसिंह भोसले तसेच जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव दीपक कपूर,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती होती
या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या भागाला पाण्याचे स्वप्न दाखवले मात्र ते पाणी दुसरीकडे वळवले. परंतु रणजितसिंह यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आज या भागाला हक्काचे पाणी मिळाले आहे. “माझा जन्मसुद्धा दुष्काळी भागात झाला आहे. त्यामुळे या भागातील लोकांच्या वेदना मला ठाऊक आहेत. पन्नास वर्षांपासून जे शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले. जयकुमार गोरे यांनी माणदेशाचा दुष्काळ मिटविण्याचा विडा उचलला आहे आणि लवकरच या प्रदेशात दुष्काळ शोधावा लागेल, असा काळ येणार आहे,” असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी थोड्याशा मिश्किल शैलीत रणजितसिंह यांच्या सततच्या मागण्यांवर “रणजितदादा यांच्या मागण्या म्हणजे मारुतीच्या शेपटी प्रमाणे कधी संपतच नाहीत. पण लोकप्रतिनिधींचं कामच असतं समाजातील शेवटच्या घटकासाठी मागणी करणं. जोपर्यंत लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागण्या चालूच राहतील.”
फलटण आणि परिसरातील विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या.पाडेगाव–शिंगणापूर रस्ता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच बाणगंगा नदीचा समावेश ‘अमृत’ योजनेत करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले. फलटण न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात येणार असून माळशिरस तालुक्यातील बावीस गावांना पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळणार आहे. फलटण विमानतळाचा विकास, साखरवाडीतील तहसील व पोलीस निरीक्षक कार्यालयाची स्थापना तसेच नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये नवीन औद्योगिक प्रकल्प लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. तसेच फलटण शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्याचे कामही लवकरच हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटासाठी इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक पॅकेज आमच्या सरकारने दिले आहे. आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. लाडकी बहीण योजना असो वा शेतकऱ्यांची वीज बिल माफी, या सर्व योजना सुरू राहतील. डिसेंबर २०२६ पासून शेतकऱ्यांना ३६५ दिवस मोफत वीज मिळेल. राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणणार असून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याच्या चिंतेतून मुक्त केले जाईल.”सभेच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ही सर्व कामे शक्य झाली ती तुमच्या आशीर्वादामुळे. पुढील काळात दुष्काळमुक्त आणि समृद्ध पश्चिम महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुतीच्या सरकारला पुन्हा जनतेचा पाठिंबा मिळावा, हीच माझी अपेक्षा आहे.”




