फलटण चौफेर दि ६ ऑगस्ट २०२५
फलटण शहरालगत असणाऱ्या कोळकी (ता. फलटण) या उपनगरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.६ ऑगस्ट २०२५ रोजी कोळकी गावातील नागरिकांनी फलटण येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन आपला तीव्र रोष व्यक्त केला. त्यांनी यावेळी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेवर हा अतिरिक्त बोजा टाकण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
या प्रसंगी सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल." यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, कामगार नेते पै. बाळासाहेब काशिद, पै. संजय देशमुख, संदीप नेवसे, उदयसिंह निंबाळकर, किरण जाधव, रणजीत जाधव, प्रदीप भरते, देविदास जाधव, यशवंत जाधव, ज्योतिराम दंडिले व कोळकी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.