साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
साखरवाडी, पिंपळवाडी ता फलटण – परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रात्री-अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना तसेच पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कुत्र्यांच्या या घोळक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील काही पाळीव कुत्र्यांचे मालक आपल्या कुत्र्यांची योग्य देखभाल करत नसल्यामुळे ही कुत्री भटकंती करत असतात. अशा बेफिकीर मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शिवाय, परिसरातील चिकन दुकानदार चिकनचे वेस्ट मटेरियल उघड्यावर टाकतात, त्यामुळे भटक्या कुत्र्यांना मांस खाण्याची सवय लागते आणि नंतर ही कुत्री माणसांवर हल्ला करतात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.काही वर्षांपूर्वी अशा कुत्र्यांचे नसबंदीचे अभियान राबवले गेले होते, मात्र सध्या संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. चिकन विक्रेत्यांनी उरलेले वेस्ट योग्य प्रकारे विल्हेवाट लावावे याबाबत प्रशासनाने कठोर सूचना देण्याची आवश्यकता आहे.
गणेश नगर परिसरात नुकतीच एका गोठ्यात बांधलेल्या शेळी व वासरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली, मात्र यासंबंधी कुठलीही तक्रार न झाल्यामुळे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.काही मालक रात्री पाळीव कुत्री मोकळी सोडतात, आणि ही कुत्री रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करतात. अशा बेफिकीर मालकांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे