फलटण चौफेर दि १३ नीरा उजवा कालव्याला कोळकी (ता. फलटण) गावाच्या हद्दीत लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करणार असून गळती दुरुस्तीनंतर अर्धवट राहिलेले उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासाठी कालवा सल्लागार समितीसमोर सदर विषय ठेवून पुढील कार्यवाही होईल, असे फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. फलटण,खंडाळा,पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्याची वरदायिनी असलेल्या नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तन चालू होते. मात्र पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दि ५ मे रोजी नीरा उजवा कालव्याच्या सर्व्हिस रोडने पेट्रोलिंग करीत असताना फलटण तालुक्यातील कोळकी गावाच्या हद्दीत जाधववाडी (फ) पाणीपुरवठा योजना टैंक पॉइंट जवळ कि.मी. ४९ / ९०० सव्र्हिस रोडच्या खालील बाजूस कालव्यास घळ पडून बोगद्यातून मातीमिश्रित पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सदर गळतीची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळविली. गळतीची गांभीर्याने दखल घेऊन अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी तेथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून कालव्यावरील इतर ठिकाणचे पोटपाट उघडून कालव्यातील पाण्याची पातळी कमी करून गळती रोखण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात अपयश आल्याने चालू आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या कालव्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर करणार असून राहिलेले अर्धवट आवर्तन पुन्हा सुरू करण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले