साखरवाडी गणेश पवार
साखर उद्योगातील अग्रगण्य कंपनी श्री दत्त इंडिया कंपनीमुळे फलटण तालुक्या बरोबरच साखरवाडी परिसराला उर्जितावस्था आली असून श्री दत्त इंडियाने कामगारांचा व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून शेतकरी व कामगारांचे हित पाहून चार वर्षांपूर्वी मी केलेल्या मध्यस्थीला यश आल्याने समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती आ रामराजे नाईक निंबाळकर यांनी 'लक्ष्मी विलास' या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी बैठकीत श्री दत्त इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना केले. यावेळी श्रीदत्त इंडिया साखर कारखान्यातील साखर कामगार बहु संख्येने उपस्थित होते.
रामराजे पुढे म्हणाले, पूर्वाश्रमीच्या'न्यू फलटण शुगर काळातील कामगारांच्या जुन्या थकीत देण्यांपैकी भविष्य निर्वाह निधी हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने तो सोडून इतर थकीत पगार व ग्रॅज्युटीची रक्कम श्रीदत्त इंडिया कंपनीने कामगारांना दिली असून फलटण तालुका साखर कामगार युनियन व कंपनी प्रशासनामध्ये वेळोवेळी झालेल्या बैठकांमधील निर्णयानुसार श्रीदत्त इंडिया कंपनी प्रशासनाने पूर्वाश्रमीच्या न्यू फलटण शुगर काळातील जुन्या थकीत पगारापैकी कंपनी साखरवाडीत आल्यानंतर आज अखेर एकूण पाच पगार कायम, हंगामी व तात्पुरत्या कामगारांना दिले असून 2005 सालापासून निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅज्युटीची रक्कम सुद्धा कंपनीने दिली असून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने तो सोडून इतर देणी दिली आहेत.
श्री दत्त इंडियाने बंद पडलेला कारखाना नोव्हेंबर 2019 साली विकत घेतेवेळी कारखान्याची गाळप क्षमता 2500 मेट्रीक टन इतकी होती आज या कारखान्याचे रुपडे पालटले असून दैनंदिन 7 हजार 500 मेट्रिक टन गाळप क्षमता , 27 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प, 250 केएलपीडी क्षमतेची अत्याधुनिक डिसलरीची उभारणी त्याचबरोबर साखर बारदांणाची (पीपी बॅग) बनवणारी कंपनी यासारख्या उद्योगाची श्रीदत्त इंडिया कंपनीने साखरवाडीत उभारणी करून त्यामार्फत परिसरातील हजारो युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला असून नुकताच कारखान्याने आपला चौथा गळीत हंगाम यशवी पूर्ण केला कामगार व शेतकऱ्यांना वेळच्यावेळी दिलेल्या ऊस बिले व पगार यामुळे कंपनीची विश्वासार्हता वाढून कंपनीने साखर व्यवसायात आपले आगळे वेगळे स्थान या परिसरामध्ये निर्माण केले असून श्रीदत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू व प्रीती रूपरेल यांना मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी बंद पडलेल्या कारखाना विकत घ्यायचा निर्णय घेऊन कारखाना सुरू केल्याने इतर तालुक्यात प्रत्येक हंगामात अतिरिक्त उसाचा जो प्रश्न निर्माण होतो तो या भागातील शेतकऱ्यांना भेडसावला नाही तसेच दत्त इंडियाने फक्त साखर उत्पादनावर अवलंबून न राहता उसापासून बनवले जाणारे इतर उपपदार्थ तयार होणाऱ्या उत्पादनावर भर दिल्याने या ठिकाणी भविष्यात हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील यात कोणतीच शंका नसल्याचे म्हटले.