साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
खामगाव (ता. फलटण) – खामगाव गावातील गोसावी वस्ती येथील नागरिक सध्या प्रचंड त्रास सहन करत असून, परिसरात साचलेले सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
गोसावी वस्तीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचले असून त्यात प्लास्टिक, कचरा, अन्न उरलेसुरलेले व इतर घातक कचरा तरंगताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार पसरायचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोक या परिस्थितीमुळे प्रचंड त्रासले आहेत.
ग्रामस्थांनी सांगितले की, "आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदने दिली आहेत, पण कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. अधिकारी येतात, पाहणी करतात पण नंतर काहीच घडत नाही. आमच्या आरोग्याची कोणालाही चिंता नाही का?"या समस्येमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना प्रचंड त्रास होत असून, दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील दूषित होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई करून ही सांडपाण्याची समस्या सोडवली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज-ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ही परिस्थिती अतिशय घातक ठरू शकते. स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.राहुल जाधव ग्रामस्थ खामगाव