Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एमआयडीसीतील खंडणीखोरांवर कठोर कारवाई करणार-पोलीस अधीक्षक समीर शेख



फलटण चौफेर दि ११ एप्रिल २०२५

सातारा जिल्ह्यातील एम.आय.डी.सी परिसरामध्ये खंडणी मागणे, दहशत पसरवणे, जबरदस्तीने माथाडीचे काम मागणे असे गैरकृत्य केली जात असल्याचा घटना घडत आहेत उद्योजकांना खंडणी मागून त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच महिला कर्मचारी यांच्या सुरक्षेला प्राध्यान्य देवून प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्भया पथकाव्दारे निगराणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सुरक्षिततेबाबत पोलिस मुख्यालय कार्यालयात बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  बैठकीस अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उप विभागीय अधिकारी आशिष बारकुल, उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उप विभागीय अधिकारी श्रीमती प्रियंका आंबेकर, उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, उपविभागीय अधिकारी श्रीमती उज्वला गाडेकर, उप विभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, विभागीय अधिकारी अभिजीत नाईक तसेच जिल्हास्तरीय समिती सदस्य उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा कामगार अधिकारी नितीन कवले, म.औ.वि.म.चे प्रादेशीक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे उपस्थित होते.दरम्यान, सर्व एम.आय.डी.सी. मधील व खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कंपन्यामध्ये जर कोणी खंडणी मागत असेल याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे करावी. खंडणी विरोधी गोपनीय तक्रारीसाठी नविन यंत्रणा स्थापन केली जाईल व खंडणी विरोधी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अर्जदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून तात्काळ प्रतिसादाकरता डायल ११२ नंबरचा उपयोग करण्यातबाबत सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे ग्रस्त व्यक्तींना सुरक्षीततेची आणि साहाय्याची भावना मिळेल. प्राप्त काही गोपनीय अर्जावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक समीर शेख सातारा यांनी जिल्ह्यातील संबंधीत पोलिस ठाण्यास दिले आहेत.या बैठकीमध्ये शिरवळ व खंडाळा येथील दोन कंपन्यांच्या तक्रारीची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिले. एम.आय.डी.सी. बाबतच्या असणाऱ्या तक्रारी अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन नियमीतपणे केले जाईल व गोपनीय तक्रारीकडे प्राध्यान्याने लक्ष दिले जाईल.या प्रकारच्या नैतिक व धोरणात्मक उपाययोजनांमुळे सातारा जिल्ह्यामध्ये खंडणी विरोधी लढा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.