प्रत्येकाला अपेक्षा केल्याशिवाय जगताच येत नाही, काही अपेक्षा स्वप्न रंजनात्मक असतील म्हणजे त्या प्रत्यक्षात येण्याची शक्यता फारशी नसेलही, परंतु लहान मोठ्या अपेक्षांनीच मनुष्य आशावादी बनतो, प्रयत्नशील असतो, पुष्कळ कंटाळवाणे असलेले आयुष्य तो जगत राहतो, हे झाले सर्वसामान्य माणसाचे, परंतु ज्या माणसाच्या अंगात काहीतरी करण्याची कला असते, त्यांचे मन अतिशय तरल असते, सर्वसामान्य माणसाला कलावंताच्या मानसिकतेची कल्पना नसते, कारण आतून खळखळाट असलेला कलावंत, त्याचे कलाक्षेत्र सोडून अन्य वेळेला सर्वसामान्य माणसाचे जीवन जगत असतो, म्हणून त्याच्या आत पेटत असलेल्या ज्वालामुखीचा पत्ता फारसा कुणालाच लागत नाही. काहीही निर्मिती करणे, ही मुळात अतिरिक्त वेदनेची आणि नंतर कदाचित थोडी सुखाची बाब असते, एखादी चांगली चित्रकृती असो किंवा असामान्य असे साहित्य कृती असो, वा निर्मितीची, ही सारीच क्रिया प्रसुती सारखी आहे, एखादे बीज प्रथम रुजवायला हवे, रुजल्यानंतर त्याची कुठेतरी वाढ होऊ द्यायला हवी, व नंतरच ते प्रत्यक्ष प्रकाशात येते, आपण मंदिरात जातो व देवासमोर नतमस्तक होतो, परंतु देवळात असणाऱ्या दगडाला देवत्वाचे रूप का आलं ! हे कोणाला माहित नसतं, कारण सारे शरणार्थी असतात, या दगडात एक अलौकिक सामर्थ्य असतं, ते समजून घेण्याची क्षमता यापैकी कुणाजवळ ही नसते, परंतु देवाला देवत्वरूप प्राप्त करून देण्याचे काम एका कलावंतात असते.
असाच एक अवलिया कलाकार, 'कला हीच त्याची ओळख'
श्री महादेव तुकाराम चव्हाण, पिंपळवाडी. ता. फलटण. जि. सातारा. लोहार समाजातील असून आपल्या कलेच्या आधारे तो विविध क्षेत्रात, इलेक्ट्रिक, पेंटिंग, दगडातून मूर्ती कला, नाटक, भारुड, रांगोळी, तसेच गेली अनेक वर्ष साखरवाडी मध्ये विविध उपक्रमाने साजरे होत असणारे, नवरात्र शारदोत्सव मंडळामध्ये हर हुन्नरी कार्यकर्ता म्हणून काम करतो, काही ठिकाणी मोबदला, काही ठिकाणी विना मोबदला, मिळेल तेवढ्यात समाधानी, नाटक भारुडात राजाचे काम करणारा कलाकार प्रत्यक्षात मात्र अपेक्षिताचे जीवन जगत आहे,
महादेवाची आर्थिक परिस्थितीत मात्र गेल्या अनेक वर्षात कसलाही बदल झालेला नाही, आहे त्यातच तो समाधान मानतो, तो गरीब असला तरी कोणापुढेही कधी हात पसरत नाही. असा हा अवलिया कलाकार आजही झोपडीवजा घरात राहतो. गेली अनेक वर्ष शासनाने दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत घरकुल योजना सुरू केली असून, आजही तो घरकुला पासून वंचित आहे,
कलाकार हा नेहमीच उपेक्षित राहत असतो, कारण कलाकाराला त्याच्या कृतीतून रसिकांकडून दाद मिळते, पण ती उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही. ?
कुठेतरी विचार होणे गरजेचे !
श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो.९९७०७४९१७७