फलटण चौफेर दि २
फलटण एज्युकेशन सोसायटीचे काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण मध्ये १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भोजराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ नरेंद्र नार्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय राष्ट्रध्वजास ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेवेळी, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड मराठी लोकांच्या मनात धुमसत होती. त्यामुळे २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांनी तत्कालीन सरकारचा निषेध करत एक मोर्चा काढला. यावेळी, आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मात्र, आंदोलकांनी त्यालाही जुमानले नाही. अखेर मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात १०६ आंदोलकांना हौतात्म्य आलं. या आंदोलकांना महाराष्ट्रभर सगळीकडे आजच्या दिवशी अभिवादन करण्यात येते व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचे योगदानाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची भाषेच्या आधारावर स्थापना करण्यात आली, तेंव्हा पासून हा दिन साजरा केला जातो्.
हा दिन साजरा करण्यासाठी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण चे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.