साखरवाडी(गणेश पवार)
फलटण बारामती रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून जागोजागी वाढलेली झाडे-झुडपे व पुलाचे तुटलेले संरक्षण कठडे हे मृत्यूला निमंत्रण देत असून जागोजागी ऐकरी व घातक वळणे केल्याने वेगाने येणारी वाहने यांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडले आहेत.तसेच सोमंथळी येथील पुलाला असणारे संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले लोखंडी संरक्षण कडे तुटले आहेत व जागोजागी काटेरी झुडपे रस्त्यावर आली असून कित्येक लोकांना काटेरी झुडपांचे फटके बसत आहेत.
फलटण-बारामती महामार्गाचे डांबरीकरण करून थोडेच दिवस उलटले असून आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेलेला आहे. याबाबत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी सूचना करूनही बांधकाम विभाग (पुणे) रस्त्याच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे फलटण बारामती रस्ता झाला तरी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ज्याठिकाणी धोकादायक वळणे आहेत ती तात्काळ काढावीत. आवश्यक आहे त्याठिकाणी डायवर्सन बोर्ड अथवा पर्यायी वाहतूक उपलब्ध केली नसल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या दोन्ही लेन कधी सुरू होणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पूर्वी फलटण-बारामती या मार्गावर प्रवास करायला एक तास एवढा कालावधी लागत होता तो आता वीस मिनिटांवर आला असला तरी रस्त्यात बऱ्याच ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांना ही वळणे लक्षात येत नाहीत. त्यामुळे रात्री उपरात्री अनेक ठिकाणी अपघात होऊन अनेकांचे प्राण गेलेले आहे तसेच या महामार्गावर महादेवनगर येथे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवण्यासाठी नादात अनेक अपघातही घडले आहेत तरीही अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
फलटणहून महादेवनगर, गणेशनगर, सोमंथळी, सांगवी, पाहुणेवाडी, गवार फाटा, सह अनेक ठिकाणी ऐकरी वाहतूक मार्ग असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नसल्याने कित्येक वाहनांचे अपघात झाले आहेत. रस्त्याची धोकादायक वळणे काढण्यात यावीत तसेच जागोजागी जेथे आवश्यक आहे तेथे दुभाजक फलक बसवण्यात यावा तसेच आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
बांधकाम विभागाच्या दळभद्री कारभारामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात जात आहेत ठिकाणी धोकादायक स्थितीत असून वळणे असून बांधकाम विभागाने ही वळणे काढल्यास किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्यास जीवित हानी होणार नाही परंतु बांधकाम विभागाने असे केले नाही. बांधकाम विभागाला याची काहीच खंत वाटत नाही. बांधकाम विभागाने फलटण बारामती रस्त्यावरील धोक्याची वळणे वाढलेली काटेरी झुडपे व पुलावरील संरक्षक लोखंडी कडे या सुधारणा कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे.