फलटण चौफेर, दि. २७ जून २०२५:
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पहिला उभा रिंगण सोहळा चांदोबा लिंब येथे मोठ्या गोंधळात पार पडला. दरवर्षी ठरलेल्या पारंपरिक जागेपासून तब्बल ७०० ते ८०० मीटर पूर्वेकडे सोहळा हलवण्यात आल्यामुळे हजारो वारकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
सातारा जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून पुरातन चांदोबा लिंब येथील पुरातन चांदोबा लिंग मंदिरासमोर उभ्या रिंगणासाठी तयारी करण्यात आली होती. या ठिकाणी पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त सुद्धा ठेवला होता दोन्ही बाजूने दोरी लावून रिंगणासाठी जागा सुद्धा तयार केली होती मात्र, पालखी सोहळा विश्वस्त मंडळाने यावर्षी अनपेक्षितरीत्या रथाचे स्थान दोन ते तीन वेळा बदलत सहाशे ते सातशे मीटर पुढे नेले. यामुळे रिंगण सोहळा नियोजित स्थळाऐवजी पुढे जाऊन कसाबसा पार पडला.
या निर्णयामुळे लाखो वारकरी, वैष्णव भक्त आणि स्थानिक नागरिक गोंधळून गेले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या अनेक वारकऱ्यांना तो क्षण प्रत्यक्ष पाहता आला नाही. अनेकांनी नाईलाजाने तिथेच परतावे लागले. अपुऱ्या माहितीमुळे एकमेकांना विचारणा करत, धावपळ करत वारकरी भिरभिरताना दिसत होतेया सगळ्या गोंधळामुळे अनेक वारकऱ्यांनी खंत व्यक्त केली. अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी “ही परंपरा आहे, यामध्ये असे बदल ऐनवेळी नकोत,” अशी प्रतिक्रिया दिली.या प्रकाराची दखल घेत पुढील टप्प्यांत व्यवस्थापन अधिक पारदर्शक व सूचनात्मक ठेवावे, अशी मागणी भक्तवर्ग व वारकरी मंडळींकडून होत आहे.