साखरवाडी(गणेश पवार)
कृषी विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून खत विक्रीत अनियमितता, पॉस मशिनचा वापर न करणे आदि कारणांमुळे जिल्ह्यातील ६ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात असून यामध्ये ४ विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर २ विक्रेत्यांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खत विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.जिल्हा अधिक्षिका कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते मिळावीत यासाठी कृषी विभागाने सर्व १२ तालुक्यांमध्ये भरारी पथके नेमली आहेत. या भरारी पथकांच्या माध्यमातून विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जात आहे. तक्रारी येणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर जावून बियाणे, किटकनाशके तसेच खतांचे नमुने घेतले जात आहेत. खरिप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, अप्रमाणित निविष्टांमुळे हंगाम वाया जाऊन नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभाग पहिल्यापासून सतर्क झाला असून या कारवाईने खत विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली असून शेतकऱ्यांमधून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.