साखरवाडी(गणेश पवार)
महाराष्ट्रातील धनगर समाज आर्थिक, सामाजिक ,राजकीय, रोजगार, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे तरी शासनाने धनगर समाजाला एस. टी.प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी दि.१५ मार्च पासून फलटण प्रांत कार्यालयासमोर पै. रजनीकांत खटके यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे.
आपल्या आंदोलनाविषयी बोलताना खटके यांनी सांगितले की, धनगर समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत ठेवले आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बारामती येथे मोठ्या प्रमाणात समाजाच्या वतीने आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाच्या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपण सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर देवेंद्रजी फडणीस साहेब मुख्यमंत्री होते आणि सध्या उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आहेत.
पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख गिळून गप्प आहेत नामदार देवेंद्रजी फडणीस यांच्या आश्वासन म्हणजे "लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरे धरणे " असेच म्हणावे लागेल. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आंदोलने उपोषणाच्या मार्गाने सतत संघर्ष सत्याग्रह सुरू आहे अद्यापही या लढ्याला यश आलेले नाही. याच मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलन उभारल्या शिवाय पर्याय नाही म्हणून मी साखळी उपोषणाचा निर्धार केला आहे असे सांगितले. उपोषण काळात चार दिवसांमध्ये विविध विविध सामाजिक , राजकीय संस्था, संघटना आणि समाजबांधवांनी भेट देऊन या चळवळीला पाठिंबा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.