संग्रहित चित्र
फलटण चौफेर दि ४ जुलै २०२५
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या चार प्रमुख धरणांमध्ये यंदा समाधानकारक पावसामुळे साठ्याची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत नोंदवलेले जलसाठा आणि पावसाचे मोजमाप दिलासादायक असल्याचे सिंचन विभागाने सांगितले आहे.
भाटघर धरण क्षेत्रात ६ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणाचा साठा १४.२२६ टीएमसी म्हणजेच ६०.५३ टक्के भरलेला आहे. सध्या ९३१ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे. निरा देवघरमध्ये १५ मिमी पावसासह ५.५२९ टीएमसी म्हणजे ४७.१३ टक्के साठा असून ४२३ क्युसेकने आवक होत आहे. वीर धरणात पावसाची नोंद नसली तरी ७.१९० टीएमसी साठा असून ७६.४२ टक्के क्षमतेने भरलेले आहे. या धरणातून सध्या ७२६८ क्युसेक विसर्ग सुरू असून त्यात १४०० क्युसेक 'एस्केप' व ५८६८ क्युसेक 'स्पिलवे' विसर्गाचा समावेश आहे. याशिवाय कालव्यांमार्फत निरा डावा कालवा ६०० क्युसेक आणि निरा उजवा कालवा १२०४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. गुंजवणी धरणात ४३ मिमी पावसाची नोंद झाली असून साठा २.६९४ टीएमसी म्हणजेच ७३.०१ टक्के झाला आहे. येथे १६६ क्युसेक आवक असून २५० क्युसेकने वीजनिर्मिती सुरू आहे.
चारही धरणांमधून मिळून एकूण २.५०६ टीएमसी नवीन आवक नोंदवली गेली असून सध्या या चार धरणांमध्ये एकूण २९.६३९ टीएमसी म्हणजेच ६१.३३ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा केवळ ८.३९५ टीएमसी म्हणजेच १७.३७ टक्के होता. त्यामुळे यंदा झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे