फलटण चौफेर दि २९ जून २०२५
साखरवाडी (ता. फलटण) – आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे बडेखान येथे श्री. ग. वि. भोसले प्रतिष्ठान यांच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तब्बल ७ हजारांहून अधिक वारकऱ्यांना अल्पोपहार, शाल व नारळाचे वितरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमात श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप विशेष उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना प्रेमपूर्वक सेवा देण्यात आली. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.प्रमुख पाहुण्यांमध्ये सचिन भोसले (अध्यक्ष), संजय भोसले (उपाध्यक्ष), हरिदास सावंत ( सचिव), अमोल भोसले (सदस्य) आदींचा सक्रिय सहभाग होता. प्रतिष्ठानच्या वतीने महिला मंडळ आणि तरुण कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून संपूर्ण व्यवस्थापन सुरळीत पार पाडले.
वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि भक्तिभावाची झळकती झलक दिसून आली. स्व. गणपतराव विठ्ठल भोसले (सर) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवला जाणारा हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रभावीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गावकरी, वारकरी, प्रशासन आणि उपस्थित नागरिकांनी श्री. ग. वि. भोसले प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले