फलटण चौफेर दि ३
रेल्वे खाली जीव देऊन आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुसेगाव येथील युवकाला आणि कोरेगाव पोलीस स्थानकातील पोलीस नाईक अमोल धनावडे व पोलीस अंमलदार सतीश कर्णे यांनी
जीवाची बाजी लावून वाचवले त्यांच्या या कामाचे दखल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेऊन त्यांचा गौरव केला
बुधवार दिनांक २ रोजी रात्री १२:१५ सुमारास एक महिला रडत रडत पोलीस ठाण्यात आली. तेथील ठाणे अंमलदारांना तिने माझा भाऊ आत्महत्या करण्यासाठी कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला आहे, असे सांगितले. त्याला वाचवा अशी आर्त हाक तिने दिली. तिची केविलवाणी अवस्था पाहून राखीव ठाणे अंमलदार असलेले पोलीस नाईक अमोल धनावडे व पोलीस अंमलदार सतीश कर्णे यांनी तातडीने मोटरसायकल वरून वायू वेगाने कोरेगाव रेल्वे स्टेशन गाठले. सुरुवातीला रहिमतपूर बाजूच्या रेल्वे रुळावरून ते १ किलोमीटर अंतर शोधत गेले. कुठेही तो युवक न दिसल्याने त्यांनी सातारा बाजूच्या रेल्वे रुळावर शोध मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान सातारा बाजूने कोल्हापूरकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसचा चालक जोरजोराने हॉर्न वाजू लागला त्यावरती आम्हास शंका आली. त्यामुळे त्यांनी ताबडतोब सातारा बाजूच्या रेल्वे रुळावरून धाव घेतली. कोरेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असल्याने सह्याद्री एक्सप्रेसचा वेग थोडा कमी होता. रेल्वे इंजिनाच्या लाईटच्या उजेडात युवक रुळावर उभा असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांनी रेल्वे इंजिनपासून अवघ्या १५ फूट अंतरावर असलेल्या युवकाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून बाजूला ओढले. युवक खाली पडताच रेल्वे पुढे निघून गेली. या संपूर्ण प्रकारामध्ये पोलीस नाईक अमोल धनावडे व सतीश कर्णे यांच्या पायाला मात्र चांगलीच दुखापत झाली आहे.
रात्रीच हा प्रकार अमोल धनावडे यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ साहेब यांना सांगितला. आपल्या कर्मचाऱ्यांनी एका युवकाचा प्राण वाचवल्याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी ही माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिली. समीर शेख साहेब यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी आपल्या दालनामध्ये पोलीस नाईक अमोल धनावडे व पोलीस अंमलदार सतीश कर्णे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत गौरव केला. यावेळी त्यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बक्षीस देखील जाहीर केले. एकूणच कोरेगाव पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आत्महत्या करण्यास निघालेल्या युवकाला जीवनदान दिले असून त्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.